मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे, नामवंत अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार आणि संगीत समीक्षक-लेखक दत्ता मारुलकर यांचा १२ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय.... ........
पद्मा गोळे
१० जुलै १९१३ रोजी पद्मा गोळे यांचा जन्म झाला. त्या ‘पद्मा’ ह्या नावाने काव्यलेखन करत असत. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘प्रीतिपथावर’ हा १९४७ साली प्रकाशित झाला. कवितासंग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी (१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह.
प्रीतिपथावर ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला, तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले. स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर, संपन्न निसर्ग प्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये! स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका या बालनाट्यांच्या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे. पद्मा गोळे यांचे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.
.........
भक्ती बर्वे-इनामदार१० सप्टेंबर १९४८ रोजी भक्ती बर्वे यांचा जन्म झाला. आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या ‘माणिकमोती’ या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे. पु. ल. देशपांडे यांचे ‘ती फुलराणी’ हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या जीवनातील अत्युच्च क्षण. ‘फुलराणी’चे ११११ हून अधिक प्रयोग झाले. ‘आई रिटायर होतेय’ या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हिंदी चित्रपटांतील सहअभिनेते शफी इनामदार यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. १२ फेब्रुवारी २००१ रोजी भक्ती बर्वे यांचे अपघाती निधन झाले.
........
दत्ता मारुलकर
माणसे आणि संगीत या दोन गोष्टी दत्ता मारुलकर यांना आवडायच्याय सैन्यातली नोकरी त्यांनी प्रामाणिकपणे केली; पण साहित्य-संगीतापासून दूर असणाऱ्या जगात ते रमू शकले नाहीत. १०/११ वर्षांतच त्यांनी सैन्यातून बाहेर पडून खासगी नोकरी पत्करली. त्या निमित्त दिल्ली, इंदूर, मुंबई, अहमदाबाद व शेवटी पुणे अशी भटकंती केली. पुण्यात ते स्थिरावले. कादंबरी, नाटक, कथा, कविता अशा ललित साहित्याच्या प्रांगणात ते सुजाण वाचक म्हणून वावरायचे, त्यातली सौंदर्यस्थळे गप्पांच्या बैठकीत दाखवायचेही. मुळात तल्लख पण परिस्थितीमुळे महाविद्यालयीन जीवनाला पारखे असल्याने इंग्रजी ललित-वैचारिक लेखनापासून आपण बाजूला पडलो, ही खंत त्यांना होती. ती उणीव भरून काढायला असे वाचन असलेल्या मित्रांकडून ते कुतूहल शमवायचे.
दत्ता यांचा उल्लेख संगीत समीक्षक म्हणून व्हायचा. व्याख्यानांमध्ये त्यांची शैली हरिदासी कीर्तन परंपरेच्या सर्व वैशिष्ट्यांसह प्रकट व्हायची. असे चित्रदर्शी लिखाणही त्यांचे वैशिष्ट्य. दत्ता मारुलकर यांचे १२ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.
माहिती संकलन : संजीव वेलणकर